May 21, 2026

पालखी महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा..प्रवीण माने

  • संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे.. प्रवीण माने

                 

बारामती तालुक्यातील काटेवाडी ते इंदापूर तालुक्यातील सराटी गावादरम्यान अनेक वर्षांपासून रखडलेल्या श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या अपूर्ण कामाबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी प्रदीप गारटकर व युवा नेते प्रविण माने यांच्यावतीने करण्यात आली आहे.

निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील इतर अनेक भागांमध्ये श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम पूर्ण झालेले असताना, इंदापूर तालुक्यातील काटेवाडी ते सराटी हा महत्त्वाचा टप्पा अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह प्रवासी, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि वारकरी यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.

विशेषतः दरवर्षी होणाऱ्या पालखी सोहळ्यादरम्यान या मार्गावर प्रचंड गर्दी होत असते. अशा परिस्थितीत रस्त्याचे अपूर्ण काम हे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर समस्या बनले आहे. खराब आणि अपूर्ण रस्त्यामुळे वाहतूक कोंडी, धुळीचे प्रमाण, तसेच अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची बाबही निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे.

या मार्गावर गेल्या काही वर्षांत अनेक अपघात घडले असून, त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काही नागरिक कायमस्वरूपी अपंगत्वाला सामोरे गेले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर, बारामती तालुक्यातील काटेवाडी ते इंदापूर तालुक्यातील सराटी गावापर्यंतच्या श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे उर्वरित काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागास निर्देश द्यावेत, अशी मागणी श्री गारटकर व माने यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

रस्त्याचे काम लवकर पूर्ण झाल्यास नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि वेगवान प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल तसेच अपघातांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या पालखी मार्गाकडे केंद्र शासनाने प्राधान्याने लक्ष द्यावे, अशीही  विनंती करण्यात आली आहे.या वेळी राज्याची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राज्याचे माझे सहकार व संसदीय कार्यमंत्री आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ दादा माने, कुमारशेठ माने, सोनाई परिवाराचे सदस्य संचालक उपस्थित होते.

error: Content is protected !!